Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैभववाडीत पान शॉपवर अन्नसुरक्षा विभागाचा छापा : विमल व आरएमडी गुटखा जप्त

वैभववाडीत पान शॉपवर अन्नसुरक्षा विभागाचा छापा : विमल व आरएमडी गुटखा जप्त

वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी शहरातील एका पान शॉपवर अन्नसुरक्षा विभागाने धडक कारवाई करत प्रतिबंधित विमल पान मसाला व आरएमडी गुटखा असा एकूण २ हजार ८३८ रुपये किमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी समर्थ पान शॉपचे मालक सदानंद मोतीराम पाडावे (रा.

वैभववाडी) यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गुटखा व पान मसाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्नसुरक्षा विभागाला वैभववाडी परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून समर्थ पान शॉपची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला विमल पान मसाला व आरएमडी गुटखा आढळून आला. त्यानंतर संबंधित माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी तेजश्री बादशाह ताजणे, अभय चंदनशिवे आणि करण गावित यांच्या पथकाने केली. कारवाईनंतर अन्नसुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सदानंद पाडावे यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस आणि अन्नसुरक्षा विभागाकडून सुरू आहे.

दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवायांना अधिक वेग आला असून राज्यभर धडक तपासण्या सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अन्नसुरक्षा विभाग सक्रिय झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कुडाळ, सावंतवाडी आदी तालुक्यांमध्येही अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. आता वैभववाडीत झालेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अन्नसुरक्षा विभागाने दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital