भोर, पुणे | नसरापूर प्रतिनिधी
भोर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उमटू लागले असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. अंड्यांची निर्यात घटल्याने बाजारात अंड्यांचा साठा वाढला असून त्यामुळे दरात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील अंडा उत्पादक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम अंड्यांच्या निर्यातीवर झाला असून मोठ्या प्रमाणात निर्यात घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत अंड्यांचा पुरवठा वाढल्याने दर कोसळले आहेत. सध्या एका अंड्यामागे सरासरी दीड रुपयांपर्यंत दर घसरल्याचे चित्र आहे.
दर घसरत असताना उत्पादन खर्च मात्र वाढत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. युद्धामुळे कोंबड्यांचे खाद्य (फीड) तसेच औषधांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खर्च वाढ आणि उत्पन्न घट अशा दुहेरी संकटात अंडा उत्पादक अडकले आहेत.
भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक अनिल थोपटे यांनी सांगितले की, "सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून अंड्यांचे दर सतत घसरत आहेत. उत्पादन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेकांना पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते."
ग्रामीण भागात पोल्ट्री हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय मानला जातो. मात्र सध्याच्या घडीला या व्यवसायावर संकटाचे सावट असून शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, भोर येथील एका पोल्ट्री फार्मला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असता उत्पादन आणि विक्री यामधील तफावत स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळात पोल्ट्री व्यवसायाचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

