उरुळी कांचन, (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना कोणताही अडथळा किंवा अडचण येऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून लोणी काळभोर येथील शनिवार (ता.
11) आणि उरुळी कांचन येथील रविवारचा (ता. 12) आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
याबाबत लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी लोणी काळभोर व उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या प्रशासकांना लेखी पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
शासकीय आदेशात नमूद केल्यानुसार, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. 11) लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती या ठिकाणी आगमन व रात्रीचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुढील दिवशी, म्हणजेच रविवारी (ता. 12) सकाळी हा पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणाहून प्रस्थान करेल आणि उरुळी कांचन भागात विसाव्यासाठी येईल. या दोन्ही दिवशी महामार्गावर आणि संबंधित गावांमध्ये भाविकांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे.
लोणी काळभोर आणि उरुळी कांचन या दोन्ही मोठ्या गावांमध्ये अनुक्रमे शनिवार व रविवारी मुख्य आठवडी बाजार भरतो. पालखी सोहळ्याचे आगमन आणि आठवडी बाजाराचा दिवस एकाच वेळी येत असल्याने बाजारातील गर्दी, दुकाने आणि वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची आणि वारकऱ्यांना त्रास होण्याची शक्यता होती.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

