Talegaon Dabhade : वडगाव : तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला मोठा दिलासा मिळाला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे 3 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
या प्रकल्पामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 1 कोटी 35 लाख रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या जलशुद्धीकरण केंद्रामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर या भागांतील पाणीपुरवठा अधिक मजबूत होणार आहे. तसेच चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बोलताना सांगितले की, स्टेशन परिसरातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
तसेच तळेगाव स्टेशन परिसरासाठी आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन योजनेला अंतिम मंजुरी मिळण्याच्या मार्गावर असून, लवकरच या कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेमुळे भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. पुढील काही वर्षे वाढत्या लोकसंख्येचा विचार करून हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

