पक्षशिस्तीचा गवगवा करणाऱ्या भाजपमध्येच आता अंतर्गत वाद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील संघर्ष थेट पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारापर्यंत पोहोचला आहे.
या दोन्ही नगरसेविकेंनी एकमेकांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच टक्केवारीच्या आरोपांवरून भाजपच्या आजी माजी नगरसेविकांचा वाद शिवीगाळपर्यंत पोहचला होता. पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघीत तात्पुरता समेट घडवून आणला. हा वाद निवळला नाही तोच प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणुकीत एकत्र लढलेल्या नगरसेविका अर्चना पाटील आणि नगरसेविका मृणाल कांबळे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. आता या संघर्षाने उघड राजकीय लढाईचे स्वरूप धारण केले आहे.

