मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात 'शिवभोजन' उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज रविवारी झाला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. मुंबई उपनगरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या उपहारात ही 10 रुपयांत मिळणाऱ्या थाळीचे उद्घाटन करण्यात आले. राज्यात 26 जानेवारीपासून 150 ठिकाणी शिवभोजन योजना सुरू झाली असून 10 रुपयांत सकस जेवण मिळत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पोटाला जात-धर्म नसतो असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. त्यांच्याच भूमिकेतून ज्याला भूक असेल त्याला 10 रुपयांत शिवथाळी मिळणार', असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासाठी आधारकार्डसारखा कोणताही पुरावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनी राज्यात 'शिवभोजन' थाळीचा शुभारंभ
आगामी काळात शिवभोजन ही योजना वाढवण्यात येणार असून ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल आणि आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी सुरू करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या योजनेसाठी सीएसआर फंड, कॉर्पोरेट फंडही वापरला जाईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

