केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) कामकाज आणि अंतर्गत व्यवस्थेत सध्या सावळागोंधळ सुरू आहे. दहावी, बारावीच्या निकालानंतर सीबीएई संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन सरकारी आदेशानुसार, सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
परीक्षा व्यवस्थापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी, तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची गरज लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सीबीएसईच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालानंतरच्या कामाच्या छाननीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठी चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मिळवण्यात अडचणी येत होत्या. बोर्डाच्या इतर ऑनलाइन सेवा वापरण्यातही अडचणी आल्या. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन डिजिटल प्रणालीबद्दल (OSM) सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या बदलीमागे ऑन-स्क्रीन मार्किंगमधील (OSM) अनियमितता आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या परीक्षेच्या स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्यात आलेल्या अडचणी ही मुख्य कारणे मानली जाते. यावर्षी, सीबीएसईने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी OSM चा वापर केला. दरम्यान, यावर्षी सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या निकालात घसरण झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मिळवण्यात अडचणी आल्या. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका अस्पष्ट होत्या, असा दावाही विद्यार्थ्यांनी केला. अनेकांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याबद्दल आणि अयोग्य तपासल्याबद्दल तक्रार केल्या.

