ग्वाल्हेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून रेबिजमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये रेबिजच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ग्वाल्हेरच्या जयआरोग्य चिकित्सालयामध्ये (JAH) दाखल झालेल्या एका तरुणाचा शनिवारी सकाळी रेबीजमुळे मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव राजू कुशवाहा (३६ वर्षे ) असून तो राक्षी पुल, माणिक की गोठ येथील रहिवासी होता. त्याला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, राजू घराबाहेर कुत्र्याला खाऊ घालत असताना त्याला कुत्र्याने चावा घेतला. त्यावेळी त्याला फक्त टिटॅनसचे इंजेक्शन देण्यात आले, परंतु रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली नाही. सुमारे २० दिवसांनंतर, त्याच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने, रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गेल्या तीन महिन्यांमध्ये ग्वाल्हेरमध्ये रेबीजच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या काळात आठ जणांना संसर्ग झाला असून, त्यापैकी सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
ग्वाल्हेरमध्ये डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत कुत्रा चावल्याच्या १३ हजार ५७९ घटनांची नोंद झाली. यापैकी ६०५७ रुग्णांवर जयआरोग्य रुग्णालयात, ३७७२ रुग्णांवर मुरार जिल्हा रुग्णालयात आणि ३७५० रुग्णांवर हाजिरा सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते , रेबीज हा लसीकरणाने टाळता येणारा, प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारा (झुनोटिक), विषाणूजन्य आजार आहे. हा आजार मज्जासंस्थेवर परिणाम करतो. रेबीजचा संसर्ग कुत्रे, मांजरे, पाळीव जनावरे आणि वन्यजीव यांसारख्या सस्तन प्राण्यांना होतो. हा आजार लाळेद्वारे माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, “एकदा आजाराची लक्षणे दिसू लागली की, रेबीज जवळजवळ १००% प्राणघातक ठरतो.”

