देशभरात उष्णतेची लाट सुरू झाल्याने, वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना पसंती दिली आहे. परंतु यामुळे मनाली, शिमला, मसुरी आणि नैनितालसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये 'महाजाम'ची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
रविवारी सकाळपासूनच चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग, अटल बोगद्याचा मार्ग, मॉल रोड, वशिष्ठ, सोलांगनाला आणि पालचन परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहने तासन्तास रेंगाळत होती. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषतः मनाली ते सोलांगला आणि अटल बोगद्याच्या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी झाली. पालचन ते सोलांगपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. वीकेंड आणि सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक एकाच वेळी हिल स्टेशन भागात पोहोचल्याने रस्ते आणि पार्किंग सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पर्यटनाचा वाढता दबाव लक्षात घेता रस्ते आणि पार्किंग सुविधांचा विकास अपेक्षित वेगाने झालेला नाही. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
वाहतूक कोंडीचा परिणाम स्थानिक टॅक्सी चालक, कर्मचारी आणि शाळकरी मुलांवरही होत असल्याचे समोर आले आहे. मनाली शहरातील मॉल रोड आणि बस स्थानक परिसरातही मोठी गर्दी दिसून आली. अव्यवस्थित पार्किंग आणि अरुंद रस्त्यांमुळे अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटनवाढीचे स्वागत केले असले, तरी वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. प्रशासनाने अतिरिक्त पार्किंग सुविधा, शटल सेवा आणि शहरात वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांनी पर्यटकांना संयम बाळगण्याचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

