अजिंक्य रहाणेने एकाकी लढत देत केकेआरचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला खरा, पण एकाही फलंदाजाची त्याला साथ न मिळाल्यामुळे केकेआरचा संघ हरला. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवत प्ले ऑफ गाठले होते.
त्यामुळे या सामन्याला स्पर्धात्मक अर्थ राहिलेला नव्हता. पण केकेआरचा संघ आपल्या अखेरच्या सामन्यात तरी विजय मिळवेल, असे वाटत होते. पण दिल्ली कॅपिटल्सचे 204 धावांचे आव्हान त्यांना पेलवता आले नाही. त्यामुळे दिल्लीने केकेआरवर 40 धावांनी विजय साकारला.
के. एल. राहुलच्या दमदार खेळीने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. राहुलने 30 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 60 धावांची खेळी साकारली. अक्षर पटेल (39) आणि डेव्हिड मिलर (28) यांनी अखेरच्या षटकांत धडाकेबाज फटकेबाजी केल्यामुळे दिल्लीला 203 धावांपर्यंत मजल मारता आली.
दिल्लीच्या 204 धावांचा पाठलाग करताना अजिंक्यने संघाला लक्षणीय सुरुवात करून दिली. पण अजिंक्यला कोणाचीही साथ न मिळाल्यामुळे केकेआरचा पराभव निश्चित झाला. अजिंक्यने 39 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 63 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने यावेळी तीन विकेट्स मिळवले.

