रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेवर विपरित परिणाम झाला आहे़. सुरुवातीला 104 ठिकाणी सुरु झालेली लसीकरण मोहिम सध्या फक्त 23 ठिकाणी सुरु आहे़. सध्या आरोग्य विभागाकडे कोवॅक्सिनचे 820 डोस शिल्लक आहेत़. गुरुवारपर्यंत लस उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील लसीकरणाची मोहिम ठप्प होऊ शकते़. शिल्लक राहिलेले डोस संपणार असल्याने शुक्रवारपासून कोवीड लसीकरण थांबण्याची शक्यता आहे़.
रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली़. पहिल्या दिवसापासून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला़. जिल्ह्यातील 104 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली़.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने लसीकरण मोहिम कोलमडली़. 104 पैकी सध्या फक्त 23 ठिकाणीच लसीकरण मोहिम सुरु आहे़. बुधवारी कोल्हापूरहून लसीचे 1120 डोस उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा लसीकरण मोहिम राबवण्यात आली़. सध्या आरोग्य विभागाकडे 820 डोस शिल्लक आहेत़. आरोग्य विभागाने लसीची मागणी केली असून लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहिम ठप्प होण्याची शक्यता आहे़. रत्नागिरी जिल्ह्याने लसीकरणासाठी एक चांगली यंत्रणा उभी केली आहे़. दिवसाला 3000 डोस देण्याची क्षमता या यंत्रणेत आहे़. मात्र त्याकरीता लस उपलब्ध होणे आवश्यक आहे़.
आज 23 ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात आले़. उद्याही काही ठिकाणी लसीकरण मोहिम होईल़. त्यानंतर मात्र लसीकरण मोहिम थांबवण्याबाबतचे पत्र सर्व लसीकरण केंद्रांना पाठवले आहे़. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्रे सुरु होतील़.
- डॉ़.बबीता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी

