तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने विसरलेली बॅग पोलिसांना परत देत भाईंदरमधील एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे. जवळपास १५ लाखांचे दागिने परत केल्याने पोलीस मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी रिक्षाचालकाचे कौतुक करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
मीरा रोड पूर्वेकडे राहणारे सुरेशसिंग चौधरी (५२) यांचे किराण्याचे दुकान आहे. ते राजस्थानहून मुंबईला येत असताना मीरा रोड येथे घरी रिक्षाने जात होते. त्यावेळी सुरेशसिंग हे दहा तोळे सोने असलेली बॅग रिक्षात विसरले. दरम्यान, घरी गेल्यावर रिक्षात बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मीरा रोड पोलीस ठाणे गाठत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी तत्काळ घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्याआधी चंद्रशेखर यादव या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत रिक्षात विसरलेली बॅग परत केली.
आणि त्यांचे डोळे पाणावले
.. रिक्षात विसरलेल्या १० तोळे दागिने मूळ मालक सुरेशसिंग चौधरी यांना परत केल्यानंतर चौधरी यांचे डोळे पाणावले. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचा परिसरात कौतुक होत आहे. या रिक्षाचालकाचा पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांनी कौतुक केले.

