मुंबईकर उकाड्याने हैराण झाले असतानाच शनिवारी रात्री पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा उडाला. जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार बंद झाला.
त्यामुळे संपूर्ण रात्रभर नागरिकांची झोपमोड झाली. यात वयोवृद्ध नागरिक, लहान मुले आणि रुग्णांचे हाल झाले. वीजपुरवठा वेळीच सुरळीत करण्याकामी प्रशासन अपुरे पडल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहर परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. त्याचप्रमाणे आता पश्चिम उपनगरात वीज गायब होऊ लागली आहे. शनिवारी रात्री जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी, सर्वोदयनगर, कोकणनगर, शिवटेकडी, प्रतापनगर तसेच अंधेरीतील शेर-ए-पंजाब कॉलनी आणि गोरेगाव येथील बिंबिसार नगर परिसरात विजेचा वारंवार लपंडाव सुरू होता. बंद झालेला वीजपुरवठा वेळीच पूर्ववत करण्यात प्रशासन अपयशी ठरले.

