जळगाव जिह्यात तापमानाचा पारा हा 44 अंशांपार गेला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येत आहे. बाजारात भाज्यांची आवक घटल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
जळगाव जिह्यातील बाजारात बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत.
भाजीपाला व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, भेंडी, टमाटे, वांगी आणि हिरवी मिरची यांचे दर सध्या 40 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर गवार 70 रुपये किलो, फ्लॉवर आणि शेवगा 60 रुपये किलो दराने विक्री होत आहेत.हिरव्या भाज्यांमध्येही दरवाढ जाणवत असून मेथी आणि पालक यांची जुडी 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे कोथिंबिरीचे दर तब्बल 120 रुपये जुडीवर गेल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळेच ही दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने भाज्यांची आवक आणखी घटू शकते आणि दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

