आपल्याला देह आणि आत्मा अशा दोन गोष्टींचे कल्याण करायचे आहे. देहाचे कल्याण म्हणजे संसार, घरदार, संपत्ती आणि व्यवसाय या सगळ्यांमध्ये यश येणे, हे भौतिक कल्याण आहे. मोक्ष मिळवणे, हे मनुष्याच्या जन्माचे अंतिम साध्य आहे.
त्याला 'पारमार्थिक कल्याण' असे आपण म्हणतो. मग यासाठी भौतिक जीवनात धर्माचरण हे सर्वश्रेष्ठ आहे आणि अत्यावश्यकही आहे. म्हणून नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, उपासना आणि प्रायश्चित्त ही जी षट्कर्मे सांगितलेली आहेत ती यथायोग्य आचरण करणे, हे आद्यकर्तव्य आहे.
यांपैकी नित्यकर्म म्हणजे जी प्रतिदिन करायचीच असतात ती करणे. आपण प्रतिदिन स्नान करतो, संध्या करणे, देवाची पूजा करणे. नैमित्तिक कर्मामध्ये श्राद्ध इत्यादी क्रिया. काम्य कर्म, म्हणजे काही प्राप्त होण्याच्या कामनेने केलेली कर्म आणि निषिद्ध कर्म म्हणजे जी करू नयेत ती कर्म. उपासना म्हणजे ईश्वरी भक्तीची साधना आणि प्रायश्चित्त म्हणजे चुकीच्या कर्मासाठी स्वतःला शिक्षा करून घेणे.
- भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

