नवी देहली - राजधानीतील रस्त्यांवर मोकाट फिरणार्या गायी आणि त्यांची दयनीय अवस्था यांवर उपाय काढण्यासाठी देहलीतील रेखा शर्मा शासनाने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. यांतर्गत गोशाळांना देहलीच्या 'रिज' परिसरातील हिरव्यागार जंगलांशी जोडले जाईल.
'देहली रिज' हा देहलीनिकट असलेल्या अरावली पर्वतरांगांजवळील जंगलाचा परिसर आहे. ७ सहस्रांहून अधिक हेक्टर परिसरात पसरलेल्या या हिरव्यागार क्षेत्राला 'देहलीचे फुफ्फुस'ही म्हटले जाते. शहरातील प्रचंड गर्दी आणि वाहतुकीच्या कोंडीपासून दूर एका नैसर्गिक अन् मोकळ्या वातावरणात गायींना निवारा देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हे वातावरण त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरेल. त्यामुळे 'रिज' परिसरात गोशाळा उभारलत्या जातील, असे देहली शासनाने स्पष्ट केले.
नवीन गोशाळांच्या उभारणीसाठी देहलीतील १३ जिल्ह्यांमध्ये भूमीची निवड सरकारने यापूर्वीच केली आहे. ही केंद्रे केवळ गायींच्या निवार्यापुरतीच मर्यादित नसतील; तर ती स्वयंपूर्ण संस्था म्हणून कार्यरत रहावीत, यासाठी तिथे पशुवैद्यकीय सेवा, सौर ऊर्जा प्रणाली आणि बायोगॅस प्रकल्प यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.
मुख्यमंत्री रेखा शर्मा यांनी नमूद केले की, पूर्वी खतांच्या (शेणाचा) योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने गायीचे शेण गटारांमध्ये वाहून जात होते आणि शेवटी यमुनेच्या पाण्यात मिसळत होते. ही समस्या सोडवण्यासाठी आता ६ बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. या प्रकल्पांची प्रतिदिन साधारण दीड सहस्र टन शेणावर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. या उपक्रमांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात आला आहे.

