दोडामार्ग - तालुक्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिलारी-तेरवण धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने घोटगे-परमे गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या २ गावांमधील संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'नागरिकांनी नदीकाठ आणि पुलाच्या जवळील परिसर येथे जाणे टाळावे', असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
सतत चालू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि ओढे दुथडी भरून वहात असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

