सांगली, २ जून (वार्ता.) - महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेला 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६' या कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने अधिकाधिक प्रमाणात ५ जूनपर्यंत हरकती पाठवण्याचा निर्णय येथे झालेल्या गुरव समाजाच्या मेळाव्यात एकमताने घेण्यात आला.
या बैठकीला सांगली जिल्हा गुरव समाजातील सर्वश्री बाळासाहेब गुरव, सुनील गुरव, बाबा गुरव, प्रवीण गोडबोले, दीपक गुरव, प्रा. बाबूराव गुरव उपस्थित होते. बैठकीत रेणावी येथील श्री रेवणसिद्ध देवस्थानचे श्री. बालाजी गुरव म्हणाले की, कायद्याच्या विरोधात आणि गुरव समाजाच्या इतर मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील गुरव समाज सहस्रोंच्या संख्येने राज्य सरकारकडे हरकती प्रविष्ट करील. जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या वतीने प्रत्येक गुरवाने ५ जूनपर्यंत अधिकाधिक हरकती प्रविष्ट कराव्यात.
या वेळी मंदिर महासंघाचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संजय घाटगे म्हणाले की, देवस्थानांच्या नावावर असलेल्या भूमी देवस्थानांच्याच नावावर असल्या पाहिजेत. राज्य सरकारने असा कायदा करणे, म्हणजे देवाला रस्त्यावर आणण्याचा प्रकार आहे.

