मस्कत (ओमान) - अमेरिकेच्या नौदलाने ओमानच्या समुद्रात 'सेटेबेलो' या तेलवाहू नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे केलेल्या आक्रमणात आदित्य शर्मा, शिवानंद चौरसिया आणि सुरेश या तिघा भारतीय नाविकांचा मृत्यू झाला.
'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'चे सरचिटणीस मनोज यादव यांनी आक्रमण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
🚨 US-Iran War: 3 Indians Killed after US Missile Attack in Oman Sea!
Palau-flagged oil tanker MT Settebello carrying 24 Indian crew members was targeted by the US for allegedly breaching a blockade.
While 21 Indians were safely rescued, 3 tragically lost their lives.… pic.twitter.com/AyiUxETyTk
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
'सेटेबेलो' या नौकेवर एकूण २८ कर्मचारी होते. यांमध्ये २४ भारतीय, २ पाकिस्तानी, १ रशियन आणि १ युक्रेनी नागरिकाचा समावेश होता. ही नौका चीनच्या लियानयुंगांग बंदराहून संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराहकडे जात होती. अमेरिकेने नौकेवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर नौकेच्या 'इंजिन रूम'ला भीषण आग लागली. यानंतर ओमानच्या सशस्त्र दलांनी आणि नौदलाने तातडीने बचावकार्य चालू करून २१ भारतियांना सुखरूप बाहेर काढले. गेल्या २४ घंट्यांत भारतीय 'क्रू मेंबर्स' असलेल्या नौकेवर अमेरिकेच्या नौदलाने केलेले हे सलग दुसरे मोठे आक्रमण आहे.
अमेरिकेने या आक्रमणाचे समर्थन करत म्हटले की, १३ एप्रिलपासून अमेरिकेने इराणी बंदरांना पूर्णपणे वेढा घातला आहे. 'सेटेबेलो' या नौकेने अमेरिकेच्या नौदलाने दिलेली चेतावणी आणि निर्देश यांचे वारंवार उल्लंघन केले. या नौकेकडून अमेरिकेची नाकाबंदी भेदल्याने त्यावर आक्रमण करण्यात आले.
अमेरिकेच्या कारवाईमुळे भारत आणि अमेरिका या दोन मित्रदेशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेचे प्रभारी (तात्पुरता पदभार असलेले) राजदूत जेसन मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून अमेरिकेचा तीव्र निषेध केला.
भारताने चेतावणी देत म्हटले की, भारतीय नाविकांच्या जिवाला धोक्यात आणणारी अमेरिकेची कोणतीही सैनिकी कारवाई खपवून घेतली जाणार नाही. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर व्यावसायिक नौकांना लक्ष्य करणे तातडीने थांबवावे. यावर अमेरिकी सरकारने 'आम्ही या प्रकरणी भारत सरकारच्या थेट संपर्कात आहोत', असे स्पष्ट केले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय दूतावास सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ओमानचे अधिकारी बचाव कार्यात सक्रीयपणे समन्वय साधत आहेत. या प्रदेशात नौकांवर होणारी सततची आक्रमणे अत्यंत चिंताजनक आहेत. आम्ही अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव तात्काळ न्यून करण्याचे अन् राजनैतिक तोडगा काढण्यासाठी चालू असलेल्या वाटाघाटी पूर्ण करण्याचे आवाहन पुन्हा एकदा करत आहोत. हा तणाव निवळल्यास या प्रदेशाला पुन्हा शांतता आणि स्थैर्य प्राप्त होऊ शकेल.
ओमान तटाजवळ 'एम्.टी. जलवीर' या नौकेवरही आक्रमण झाले आहे. या नौकेला आग लागल्याचा व्हिहिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. तथापि या घटनेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे भारतीय अधिकार्यांनी सांगितले.

