सातारा - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देणारा प्रतापगड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ऐतिहासिक प्रतापगडाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे; मात्र या निधीतून गडावर होत असलेली कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याचे शिवभक्तांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
प्रतापगडावर येणार्या जागृत शिवभक्तांनी गडावरील कामांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले, तटबंदीच्या दोन ऐतिहासिक दगडांमध्ये भरलेला माल टिकण्याऐवजी तो भुसभुशीत होऊन खाली पडत आहे. काही ठिकाणी केलेल्या कामाला भेगा पडल्या आहेत. कोट्यवधी रुपये व्यय करूनही ऐतिहासिक वास्तूंची अशी हेळसांड होत असेल, तर हा निधी जातो कुठे ? असा प्रश्न शिवभक्त उपस्थित करत आहेत.
प्रतापगड ही केवळ वास्तू नसून महाराष्ट्राची अस्मिता आहे. या अस्मितेशी खेळणार्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याऐवजी केलेल्या कामाची पारदर्शकपणे पडताळणी करावी. या कामांची तात्काळ श्वेतपत्रिका काढावी, तसेच कामाच्या चौकशीसाठी वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर समिती नेमण्यात यावी. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या शिवप्रेमी करत आहेत. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? - संपादक)

