पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारूने २४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अनेक बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. हे विषारी दारू उरुळीकांचन येथील दारूभट्टीमध्ये उत्पादित करून विक्रीसाठी विविध ठिकाणी पाठवल्याचे अनुमान व्यक्त होत आहे.
'मिथेनॉल'युक्त किंवा रसायनमिश्रित दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली.
हडपसर भागात आकाश जाधव आणि कुटुंबियांचा गेली २० ते २५ वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय आहे. 'मंत्री मार्केट परिसरा'तील एक दारूविक्री अड्डा तब्बल ४० वर्षांपासून चालू असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दारूभट्ट्यांमुळे पोलिसांची 'कमाई' चांगली होत असल्याने प्रशासकीय पाठिंबा असतो. अनेक ठिकाणी दारूनिर्मिती करण्यासाठी विशिष्ट व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवसायांवर पोलिसांची कारवाई केवळ नावापुरतीच असते. कारवाई झाल्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी दारू निर्मितीचा व्यवसाय चालतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विषारी दारूने २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये धाडी घातल्या. त्यातून ६४५ लिटर गावठी दारु जप्त केले असून दारूविक्रेत्यांवर गुन्हे नोंद केले.
अवैध दारूचे जाळे पूर्णपणे मोडित काढण्यासाठी 'या अवैध दारूचे उत्पादन नेमके कुठे चालते. त्याचे मुख्य पुरवठादार किंवा स्रोत काय आहेत ? याचा १०० टक्के शोध घेऊ. २९ मेपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 'ऑपरेशन वॉश आऊट' चालू करण्यात येत आहे. अशा प्रकारचे सर्व अवैध व्यवसाय पूर्णपणे नष्ट केले जातील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ३० मे या दिवशी मृतांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ''निधन झालेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नातेवाइकांना 'मुख्यमंत्री साहाय्यता निधी'तून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.''
या प्रकरणात आतापर्यंत २२ जणांना निलंबित केले आहे. पुणे पोलीस दलातील ३ अधिकारी, पिंपरी-चिंचवड दलातील ६ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (निलंबन नको, तर बडर्तफ करा ! - संपादक) निलंबित झालेल्यांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.

