अयोध्या (उत्तरप्रदेश) - शहरात २ जुलैच्या सकाळी ५०० हून अधिक अधिवक्ते रस्त्यावर उतरले. अयोध्या बार असोसिएशनच्या या सदस्यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्यावर श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या.
त्यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस चौकीत जाऊन या तिघांसह ४ जणांच्या विरोधात तक्रार दिली. फैजाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष कालका प्रसाद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामजन्मभूमी तीर्थ अयोध्या पोलीस ठाण्याच्या दिशेने जाणार्या अधिवक्त्यांना पोलिसांनी वाटेतच रोखले.
बार असोसिएशनचे सचिव शैलेंद्र कुमार जयस्वाल यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, तर या प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांचे दरवाजे ठोठावले जातील.
अयोध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा म्हणाले की, पोलिसांना आमची तक्रार मिळाली आहे. ते गुन्हा नोंदवतील, असे त्यांनी सांगितले आहे. आमच्या तक्रारीत चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांची नावे आहेत.
सूत्रांनुसार श्रीराममंदिरातील दान चोरीच्या आरोपींच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करणार आहे. प्रशासनाने आरोपींच्या नवीन घरांवर बुलडोझर चालवण्याची सिद्धता चालू केली आहे. ज्या घरांचा नकाशा संमत नाही किंवा ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा घरांची ओळख अयोध्या विकास प्राधिकरणाने पटवली आहे. (एखाद्याने गुन्हा केल्यावरच प्रशासनाला याची माहिती मिळते का ? अन्य वेळी प्रशासन झोपलेले असते कि पैसे घेऊन गप्प बसते ? - संपादक)
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य महंत दिनेंद्र दास म्हणाले की, या संपूर्ण विवादाला मंदिराचे साहाय्यक प्रशासक गोपाल राव हेच उत्तरदायी आहेत. उत्तरप्रदेशातील विश्वस्त प्रभु श्रीरामाच्या परंपरांचे पालन करतात, तर गोपाल राव तसे करत नाहीत. गोपाल राव विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या करतात आणि याचमुळे हा विवाद वाढला आहे. मंदिर प्रशासनात राजकारणाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
गोपाल राव राममंदिराचे बांधकाम प्रमुख आणि न्यासाचे आमंत्रित सदस्य होते. ते मूळचे कर्नाटकाचे रहिवासी आहेत.

