'प्रत्येक गोष्टीला अंत असतो', असे आपल्याकडे घरोघरी सहज म्हटले जाते. विशेषतः कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, हा वाक्प्रचार हमखास उच्चारला जातो. गेल्या काही दिवसांतील घटना पहाता हिंदूंनी हा वाक्प्रचार कृतीत उतरवल्याचे निदर्शनास येते.
म्हणजेच अनेक हिंदुविरोधी घटनांत हिंदूंनी संबंधित हिंदुद्वेष्ट्यांना चोपल्याच्या घटना घडल्या.
आपला देश हा हिंदूबहुल आहे. तरीही येथे हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींची विविध व्यासपिठांवरून कुणीही खिल्ली उडवतो. याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहून हिंदूही टाळ्या वाजवून, हसून दाद देत. पुढे या हिंदुद्वेषाने लव्ह जिहाद, लँड जिहाद आदींच्या रूपात जेव्हा प्रत्येक हिंदूच्या घराचा उंबरठा ओलांडला, तेव्हा तो काही अंशी जागा झाला. हिंदूंना या समस्येची दाहकता लक्षात आली आणि ही समस्या रोखण्यासाठी ते स्वतःच कृतीशील झाले. हिंदूंची वृत्ती मुळातच सहिष्णु आहे; म्हणूनच तर त्यांचा संयम, सहनशीलता सहज संपत नाही. गेल्या २ दशकांपासून लव्ह जिहादने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे, त्याचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी हिंदूंनी निवेदनांच्या वगैरे माध्यमातून वेळोवेळी केली आहे आणि अजूनही करत आहेत. तथापि सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. काही राज्यांनी धर्मांतरबंदी कायदा केला खरा; पण तो लव्ह जिहाद रोखण्याइतपत सक्षम नाही, ही वस्तूस्थिती आहे. असे कायदे असलेल्या राज्यांत लव्ह जिहादच्या वाढत्या घटना, हे त्याचे उदाहरण आहे. थोडक्यात लव्ह जिहाद, धर्मांतर किंवा कुठल्याही हिंदुविरोधी घटनांसंदर्भात सरकार काही बोलत नाही, कायदा काही करत नाही, प्रशासन लक्ष देत नाही आणि पोलिसांचा तर प्रश्नच नाही, अशी हिंदूंची अवस्था झाली आहे. त्यांना आशेचा किरण दिसेनासा झाल्यामुळे अंततः त्यांनी स्वतःच काही कृती करत असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून दिसून येते. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे इयत्ता ११ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा आरोपी ओसाफ अली खान याला भोपाळ जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अधिवक्त्यांनी चोपले. गुजरातमधील सुरत येथील अल्थान परिसरात एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची छेड काढणारा अजीज इलियास याला जमावाने धडा शिकवला. कर्नाटकातील बेंगळुरू शहरातील 'सिद्धार्थ मेडिकल कॉलेज'मधील एका विद्यार्थिनीला तेथील प्राध्यापक अब्दुल याने लग्नाची मागणी घातल्याने विद्यार्थ्यांनी अब्दुलला चोप दिला. मुंबईतील घाटकोपर उपनगरात ५ आणि ६ वर्षे वयाच्या २ हिंदु बालिकांना घरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा मौलवी फिरोज इक्बाल शेख यास संतप्त जमावाने चोप दिला. उत्तरप्रदेशातील रामपूर येथे विद्यार्थिनींशी छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या प्राचार्य जोसेफ याला संतप्त पालकांनी धडा शिकवला. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील रेटावंद गावातील भोळ्याभाबड्या गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्यावरून गावकर्यांनी एका पाद्र्याला मारहाण केली.

या सर्व घटना गेल्या १-२ महिन्यांतीलच आहेत. या घटनांवरून आपल्याला लक्षात येईल की, हिंदू आता जागृत होत आहेत. अर्थात् याचा अर्थ 'कायदा हातात घेणे', असा अजिबात नाही; कारण कायदा हातात घेणे, हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि निरपराध लोकांनाही त्याचा फटका बसू शकतो. यावर उपाय म्हणून शासन आणि प्रशासन यांनी अधिक संवेदनशील अन् कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. कायद्याची कार्यवाही (अंमलबजावणी) काटेकोरपणे झाली, तक्रारींवर त्वरित कारवाई झाली आणि न्याय प्रक्रिया गतीमान झाली, तर सहिष्णु हिंदू चोप देण्यासारख्या कृतीपर्यंत जाणारच नाहीत. समाजात शांतता राखणे, एकमेकांचा आदर करणे आणि कायद्याचा मान राखणे, हे सर्वांचेच दायित्व आहे. जनतेची वाढती अस्वस्थता लक्षात घेऊन तिचे योग्य मार्गाने निराकरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
हिंदू राजकीय क्षेत्रातही जागृत होत आहेत, याचे उदाहरण आपण सर्वांनी बंगालमध्ये नुकतेच पाहिले. त्यांनी भाजपला मते दिली; म्हणून ते जागृत, असे नव्हे, तर त्यांनी अन्याय, अत्याचार आदींच्या विरोधात एकसंधपणे आवाज उठवला आणि त्याप्रमाणे कृती केली म्हणून ते जागृत आहेत. गेली १५ वर्षे ममता बॅनर्जी यांच्यावर आणि त्याहीपूर्वी २ दशके साम्यवाद्यांवर विश्वास ठेवून पायावर दगड मारून घेतल्याची जाणीव हिंदूंनी झाली. त्यामुळे त्यांनी भाजपला केवळ बहुमत नव्हे, तर दोन तृतीयांश बहुमत दिले. म्हणजे ममता बॅनर्जी आणि त्याही पूर्वीच्या साम्यवादी राजकारण्यांनी जे हिंदुविरोधी कायदे केले, ते हटवण्याचा भाजपचा मार्ग आणखी सोपा झाला आहे, किंबहुना त्याच उद्देशाने भाजपला तेवढे बहुमत दिले गेले आहे. तशीच परिस्थिती आसाममध्येही पहायला मिळाली. तेथील धडाडीचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एकहाती केवळ बहुमतच मिळवले नाही, तर दोन तृतियांश बहुमत मिळवले. आसाममध्ये घुसखोरीची समस्या ज्वलंत आहे. इतर राज्यांप्रमाणे तेथेही मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असूनही तेथील लोकांना त्याहीपेक्षा घुसखोरीची समस्या अधिक भयावह वाटली. प्रत्यक्षात परिस्थितीही तशीच आहे. म्हणूनच हिमंत बिस्व सरमा यांनी गौहत्ती येथील एका सभेत 'पुढील ५ वर्षांत आम्ही बांगलादेशी मियाँची (घुसखोरांची) कंबर मोडू', असे आश्वासन हिंदूंना दिले. ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत, जे आजही उघडपणे म्हणतात की, मला मुसलमानांची मते नकोत ! आणि तरीही ते दोन तृतीयांश बहुमताने निवडून येतात आणि पक्षाला सत्ता प्राप्त करून देतात. सांगायचे तात्पर्य हेच की, बंगाल आणि आसाम या दोन्ही राज्यांतील हिंदूंच्या संयमाचा अंत झाल्यावर त्यांनी जी काही कृती करायची, ती मतपेटीद्वारे केली. यावरून 'हिंदू राजकीयदृष्ट्याही जागृत झाला आहे', असेच म्हणावे लागेल.
हिंदूंची ही जागृती क्षणिक न ठरता ती दीर्घकालीन, संघटित आणि कायद्याच्या चौकटीत रहाणारी असावी. अन्यायाविरुद्ध आवाज उठवतांना संयम, विवेक आणि सामाजिक दायित्वाचे भान यांचा समतोल राखणे तितकेच आवश्यक आहे. शासन, पोलीस आणि प्रशासन यांनीही या वाढत्या अस्वस्थतेची वेळीच नोंद घेऊन ठोस अन् निष्पक्ष कृती करणे ही काळाची आवश्यकता आहे. न्यायव्यवस्थाही वेगवान आणि परिणामकारक झाली, तर समाजात विश्वास आणि स्थैर्य निर्माण होईल. या सर्व स्तरांवर पालट झाल्यास कुणीही गुन्हा करू धजावणार नाही आणि मग कुणाच्या संयमाचा अंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही !

