Dailyhunt
संपादकीय : हिंदूंची अपकीर्ती !

संपादकीय : हिंदूंची अपकीर्ती !

कोल्हापूर येथे मार्च महिन्यात अमली पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ अधिक संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हातात अनेक प्रबोधनात्मक फलक घेतले होते.

याविषयी काढलेली छायाचित्रे मिळवून धर्मांध अब्दुल कसाई आणि त्याचे अन्य साथीदार यांनी ती 'मॉर्फ' करून त्यामध्ये पालट केले. 'भोंदू अशोक खरात याची सुटका करण्यासाठी हिंदू आंदोलन करत आहेत, त्याला सोडण्याची हिंदूंची मागणी आहे, असे वाटावे', असे पालट छायाचित्रात करण्यात आले होते. हे छायाचित्र सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी त्यावर आक्षेप घेतला आणि पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली. असा घृणास्पद प्रकार करून याद्वारे धर्मांधांनी एकाच वेळी हिंदुत्वनिष्ठ, हिंदूंचे आंदोलन आणि हिंदु धर्म यांची अपकीर्ती केली आहे. हिंदूंवर चिखलफेक करण्याचा आणि हिंदूंमध्येच भांडणे लावण्याचा प्रयत्न हा ठरवून केलेला आहे.

भोंदू अशोक खरात याच्या काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. भोंदू खरातविषयी समाजामध्ये पुष्कळ संताप आणि चीड आहे. शेकडो लोकांना लुबाडणार्‍या, शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या खरातला सार्वजनिकरित्या कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समस्त हिंदू आणि काही लोकप्रतिनिधी यांची आहे. त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचे ममत्व हिंदूंना वाटायला काही कारणच राहिलेले नाही. खरातचे लैंगिक शोषणाच्या व्यतिरिक्तही अनेक कारनामे प्रतिदिन वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समाजासमोर येत आहेत. असे असतांना त्याच्या सुटकेसाठी हिंदू आंदोलनाचा विचारही करू शकत नाहीत. एका चांगल्या आंदोलनाचा वाईट हेतूने उपयोग करून 'जागृत हिंदू हे भोंदूला पाठिंबा देतात', असा संदेश देण्याचा प्रयत्न करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न ढळढळीतपणे दिसून येत आहे. हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी धर्मांध आणि पुरोगामी एकही संधी सोडत नाहीत. अशोक खरात याने कुठलीही भगवी वस्त्रे परिधान केली नव्हती. खरात एक खोटा ज्योतिषी आणि अंकतज्ञ आहे. असे असूनही सातत्याने 'खरात बाबा', असा उल्लेख बातम्या आणि सामाजिक माध्यमे यांत करून हिंदु संतांची अपकीर्ती करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. एरव्ही कुणी मुसलमान फकीर किंवा ख्रिस्ती पाद्री यांना एखाद्या गुन्ह्यात पकडले, त्यांच्यावर कारवाई केली, तर त्यांची अशी अपकीर्ती करण्याचे धाडस केले जात नाही.

खरातच्या प्रकरणात हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याची जणू मोहीमच काही जणांनी उघडली आहे. त्यांना हिंदू आणि हिंदु धर्म हे 'सॉफ्ट टार्गेट' (सोपे लक्ष्य) वाटते. हिंदूंकडून तेवढा विरोध केला जात नाही, त्यामुळे त्यांचे फावते. भोंदू खरात याचे सामाजिक माध्यमांमध्ये व्हिडिओ प्रसारित करून अनेक धर्मांध 'हिंदु बाबा असे प्रकार करतो, हिंदुत्वनिष्ठच या बाबाकडे हिंदु मुली आणि महिला यांना त्यांचे शोषण करण्यासाठी जाणीवपूर्वक पाठवतात', असे लिखाण प्रसारित करत आहेत. सामाजिक माध्यमांवरील या व्हिडिओजच्या शेकडो लिंक काढण्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी धर्मांध त्यांनाही जुमानत नाहीत. खरात याचे अश्लील व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करून 'हिंदु बाबा कसा आशीर्वाद देत आहे, हे पहा', अशी माहिती लिखाणामध्ये दिली जाते. त्यामुळे संबंधित पीडित महिला-मुली यांची ओळख उघड होऊन त्यांना समाजात वावरणेही कठीण होते. काही धर्मांधांकडून हिंदु धर्म आणि देवता यांची चित्रे विकृत करून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली जातात. तेव्हा तात्कालीक स्वरूपात काही हिंदू तुरळक विरोध करतात, संबंधित लिखाण काही दिवसांनी सामाजिक माध्यमांतून काढले जाते आणि काही दिवसांनी नवीन प्रकरण घडल्यावर पुन्हा तसेच केले जाते.

हाच भाग जर मुसलमानांविषयी झाला असता, तर त्यांनी जिल्हा, राज्य नव्हे, तर देशात दंगली केल्या असत्या, हिंदूंवर दगडफेक करून दहशत निर्माण केली असती. कितीतरी दिवस परिस्थिती तणावग्रस्त राहिली असती. येथे प्रश्न हिंदूंचा आहे, हिंदु महिलांच्या शोषणाविषयी आहे आणि शोषण करणारी व्यक्तीही हिंदूच आहे, याचा अपलाभ धर्मांधांकडून घेतला जात आहे.

हिंदु धर्म आणि हिंदूंच्या परंपरा यांवर कुणीही ऊठसूठ टीका करू शकतो, याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे 'ईशनिंदा कायदा' सध्या भारतात अस्तित्वात नाही. यामुळे धर्मांध, तसेच पुरोगामी, नास्तिक काही लिहू वा बोलू शकतात आणि नंतर क्षमा मागण्याचे नाटक केले की, पुन्हा नवीन टीकाटिपणी करण्यास ते मोकळेच ! हिंदूंनी या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'ईशनिंदा कायदा' करण्याची मागणी लावून धरली पाहिजे. हिंदुहिताच्या आड एखादी अडचण येत असेल, तर त्वरित कायदेशीर आधार देऊन ती रोखली पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे.

देशात घडलेल्या कोणत्याही घटनेचा स्वत:च्या लाभासाठी आणि भारतविरोधी, हिंदुविरोधी प्रचार करण्यासाठी उपयोग करण्यास धर्मांध टपलेलेच असतात अन् त्यांनी ती आत्मसात केलेली विकृती आहे. देहली येथे 'राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया' आणि 'नागरिकत्व सुधारणा कायदा' या कायद्यांच्या दृष्टीने आंदोलने शांततेत चालू असतांना धर्मांधांनी दंगल घडवली. या दंगलीत धर्मांधांनी बहुसंख्य हिंदूंनाच अत्यंत क्रूरपणे ठार केले आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार काय केला जातो, तर हिंदूंनी आमच्यावर आक्रमण केले, आम्ही पीडित आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि हिंदुविरोधी प्रतिक्रिया उमटल्या. कोल्हापूर येथील घटनेतही संबंधित धर्मांधांवर काही ठोस कारवाई पोलीस करतील, याची सुतराम अपेक्षा हिंदूंना वाटत नाही; कारण धर्माभिमानाचा अभाव जसा हिंदूंमध्ये आहे, तसा तो विविध प्रशासकीय व्यवस्थांमध्ये कार्यरत जन्महिंदूंमध्येही आहे. हिंदु धर्माची निंदानालस्ती करण्याची प्रकरणे ज्या संवेदनशीलतेने हाताळली पाहिजेत, तशी ती हाताळली जात नाहीत. त्यामुळे एखाद्या प्रकरणी काही तोंडदेखली कारवाई होते आणि पुन्हा तसेच प्रकार घडतात. एखादा हिंदुविरोधी चित्रपट, नाटक याविषयी तक्रार केल्यास वा तो बंद पाडला, तरी काही महिन्यांनी नवीन हिंदुविरोधी चित्रपट येतो, म्हणजे कायदा हवा आणि हिंदूंमध्ये संघटनाचा आविष्कारही हवा, तेव्हाच हे प्रकार रोखता येतील !

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi