कोल्हापूर, ६ मे (वार्ता.) - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था 'रामराज्य निर्माण अभियान' राबवत आहे.
या अभियानांतर्गत हिंदु समाजात रामराज्य आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने रविवार, १० मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथे 'हिंदु ऐक्य दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (शिवतीर्थ) येथे संपेल, अशी माहिती सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी दिली आहे.
हिंदु धर्मियांना जात, प्रांत, संप्रदाय, भाषा यांत विभाजित करण्याची कारस्थाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदु ऐक्याचा विशाल अविष्कार दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी या दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीच्या निमित्ताने विविध मंडळे, सामाजिक संस्था, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, लोकप्रतिनिधी यांना भेटून निमंत्रणे देण्यात येत आहेत.
'हिंदु एकता दिंडी'चा मार्ग : मिरजकर तिकटी-खरी कॉर्नर-महाद्वार रोड-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे सांगता

