नवी मुंबई, २९ मे (वार्ता.) - राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अलौकिक व्यक्तीमत्त्व होते, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक आणि व्याख्याते रवींद्र नेने यांनी येथे केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मराठी साहित्य मंदिर संघ, तसेच वाशी सेक्टर १९ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, उपाध्यक्ष आणि व्याख्याते रवींद्र नेने, योगेश देशमुख यांच्यासह अन्य सावरकरप्रेमी उपस्थित होते.
या वेळी रवींद्र नेने म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशभक्तीची ज्वाला होती. शिक्षण घेतांनाच त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केला. स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी वर्ष १९०५ मध्ये परदेशी कापडांची होळी केली. ही देशातील पहिली होळी ! सावरकरांनी 'अभिनव भारत' या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली. इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. त्यांनी लिहिलेल्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या पुस्तकाने भारतियांच्या मनात स्वातंत्र्याची नवचेतना निर्माण केली. इंग्रज सरकारने सावरकरांना अटक करून अंदमान येथील सेक्युलर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सावरकर हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर ते एक प्रभावी साहित्यिक आणि समाजसुधारकही होते. त्यांचे जीवन म्हणजे राष्ट्रासाठी समर्पण, धैर्य आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे.

