नाशिक - चारित्र्यावरील संशयातून दोन ते अडीच महिन्यांच्या गर्भवती प्रेयसीची हत्या करण्यात आली. मुंबईत प्रियकर आशिष मगर याने प्रेयसीला शीतपेयात डांबराच्या गोळ्या टाकून दिल्या. ते प्यायल्यावर तिला त्रास झाला.
घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले; पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :नात्यांना काळिमा फासणारी घटना !
मुंबई - रेल्वेस्थानक आणि परिसर येथे थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास आता ५०० रुपयांऐवजी १ सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास संबंधित व्यक्तीला सक्षम न्यायालयासमोर उपस्थित केले जाऊ शकते.
संपादकीय भूमिका :स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर नागरिकांची थुंकण्याची सवय जात नाही, याला कारणीभूत सर्वपक्षीय शासनकर्तेच !

नागपूर - येथे कैलास सोनदीया सकाळी ६ वाजता फिरण्यासाठी गेले असता भरधाव आलेल्या इनोव्हा चारचाकीने त्यांना उडवले. यात ते गंभीररित्या घायाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक पसार झाला.
संपादकीय भूमिका :सकाळी फेरफटका मारायला जाणेही आता धोकादायक !
प्रशासनाकडे ६८ कोटींची मागणी
पुणे - जिल्ह्यात झालेली अतीवृष्टी आणि पूर यांमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते, पूल अन् मोर्या यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये १६६.११ कि.मी. रस्ते आणि १०७ पूल अन् मोर्या बाधित झाल्या आहेत. या हानीग्रस्त रस्ते आणि पूल यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने शासनाकडे ६८ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
बदलापूर - येथे आयोजित केलेल्या 'माखन चोर दहीकाला उत्सवा'त 'प्रज्वल प्रतिष्ठान'च्या माध्यमातून गोविंदांनी ७ थरांची सलामी दिली. त्यानंतर अचानक मागे लावलेला पट्टा तुटल्याने सातव्या थरावरील लहान मुलगा खाली कोसळला. त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. सध्या तो सुखरूप आहे. शिवसेना युवा सेना शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या आयोजनातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
संपादकीय भूमिका :उंचच उंच थरांवरून पडून अनेक गोविंदा घायाळ होत असतांनाही दहीहंडीच्या उंचीवर प्रतिबंध कधी येणार ?

