Dailyhunt
बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा मुजरा केला. बारामतीकरांनी स्वर्गीय नेते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, "वहिनींनी तब्बल २ लाख १८ हजार मताधिक्याने मिळवलेला विजय हा अभूतपूर्व आहे. जवळपास ९८ टक्के मतदानातून बारामतीकरांनी व्यक्त केलेली भावना ही दादांनी केलेल्या कार्याची पावती आहे."

तसेच क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी तुलना करत त्यांनी सांगितले की, "विधानसभेत झालेला हा विक्रम चंद्र-सूर्य-तारे असेपर्यंत कायम राहील."

अजित पवार यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणे आणि ६ वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अधोरेखित केला. तसेच संबंधित महिला नेत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाच्या पातळीवर बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील राजकारणावर जनतेचा वाढता विश्वास दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांनंतर झालेले परिवर्तन "अभूतपूर्व" असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तटकरे पुढे म्हणाले की, "पश्चिम बंगालसह आसाम आणि पुदुच्चेरीतील यश हे अमित शहा यांच्या रणनीतीचे फलित आहे." तसेच तामिळनाडूमध्ये मित्रपक्षाच्या कामगिरीचाही त्यांनी उल्लेख केला.या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश प्रतिनिधी संजय तटकरे उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka