फलटण तालुक्यातील राजुरी येथे जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार धक्का लागून सतीश बापूराव निकम या ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ जुलै : फलटण तालुक्यातील राजुरी येथे जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा धक्का लागून एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश बापूराव निकम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे राजुरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजुरी (ता. फलटण) येथील भवन नगर परिसरात राहणारे सतीश निकम हे सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याजवळ होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते गंभीररीत्या भाजून खाली पडले.
विजेचा धक्का लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी सतीश निकम यांना तातडीने फलटण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.
या घटनेची खबर अमोल भानुदास निकम यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चांगण हे करत आहेत.

