गिरणा मोठ्या प्रकल्पात पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (१ ऑगस्ट २०२६) रोजी दुपारी ३ वाजता गिरणा धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग 44,568 क्युसेक्सवरून कमी करून 37,140 क्युसेक्स (1,051.06 क्युमेक्स) करण्यात आला आहे.
यासाठी गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ ते ६ प्रत्येकी १५० सेंटीमीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गिरणा नदीतील पाण्याचा प्रवाह पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी नदीपात्र आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात पुढील काळात पुन्हा वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, परिस्थितीवर पाटबंधारे विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी सांगितले.
