Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

माफी मागूनही थांबल्या नाहीत धमक्या'; 15 वर्षीय मुलीला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आता बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सततच्या धमक्यांमुळे मुलगी आणि तिच्या आईला काही दिवसांत तब्बल तीन वेळा राहते घर बदलावे लागल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे.

वकिलांच्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असून ती सध्या दहावीचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर तिच्याबाबत पसरवण्यात येणारे वय, नाव आणि व्यवसायासंदर्भातील दावे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलीची आई एकल पालक असून शिकवण्या घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारीतील पत्ता सार्वजनिक झाल्यानंतर काही लोक थेट त्यांच्या घरी पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलगी आणि तिच्या आईला जीवे मारण्याच्या तसेच बलात्काराच्या धमक्या दिल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वारंवार घर बदलावे लागल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

यापूर्वी संबंधित मुलीने व्हिडीओद्वारे देशाची आणि पंतप्रधानांची सार्वजनिक माफी मागितली होती. आंदोलनाच्या वातावरणात इतरांच्या प्रभावाखाली येऊन आपण आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे तिने मान्य केले होते. ही आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत तिने पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

या प्रकरणी यापूर्वी झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सार्वजनिक संदेशातून अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारची चूक होऊ शकते, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगत संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान , अल्पवयीन मुलीने सार्वजनिकरीत्या माफी मागितल्यानंतरही तिला आणि तिच्या कुटुंबाला बलात्कार व हत्येच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा गंभीर मानला जात आहे. मतभेद असू शकतात, कायदेशीर प्रक्रिया देखील होऊ शकते; मात्र एखाद्या अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे धमकावणे किंवा हिंसक भाषा वापरणे समाजातील चिंताजनक मानसिकतेकडे बोट दाखवणारे असल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. कोणत्याही मतभेदाचे उत्तर कायदा आणि लोकशाहीच्या चौकटीतच असावे, अशी भूमिका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon