अडीच हजार लोकांची सूची बांगला देशला सादर, बांगला देशकडून मागविले उत्तर, पाठवणी होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात अवैध प्रकारे वास्तव्य करणाऱ्या बांगला देशी घुसखोरांवर केंद्र सरकारने निर्णायक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
या घुसखोरांवर कायद्याप्रमाणे कृती केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईचा प्रथम भाग म्हणून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 हजार 680 हून अधिक बांगला देशी नागरीकांची सूची बांगला देशला पाठविण्यात आली आहे. तसेच बांगला देशकडून उत्तर मागविण्यात आले आहे. भारतात घुसखोरी केलेल्या सर्व बांगला देशी नागरीकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जातील, असे भारताने स्पष्ट केले.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत अवैध बांगला देशी नागरीकांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. या घुसखोरांच्या विरोधात भारतातील कायद्यांच्या अनुसार कारवाई केली जात आहे. हे नागरीक बांगला देशचे आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. बांगला देशला त्यांची सूची पाठविण्यात आली आहे. त्यांच्या नागरीकत्वाल दुजोरा मिळाल्यानंतर आम्ही त्यांची पाठवणी त्या देशात करणार आहोत. बांगला देशने या नागरीकांच्या नागरीकत्वाला दुजोरा त्वरीत द्यावा, अशी भारताची अपेक्षा आहे. पूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये हे सत्यापन करण्यास पाच वर्षे किंवा त्याहूनही अधिक वेळ लागला आहे. यावेळी तसे होणार नाही, अशी अपेक्षा रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केली. घुसखोरांनी स्वत:हून निघून जाण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सरकारने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, असे विधान अमित शाह यांनीही केलेले होते.
सत्तापरिवर्तनानंतर हालचाली वेगवान
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता जाऊन आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. हे सत्तापरिवर्तन झाल्यानंतर घुसखोरांविरोधातील कारवाईला मोठा वेग आलेला आहे. तसेच अवैध घुसखोरांमध्येही घबराट पसरलेली असल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घुसखोरांना इशारा दिल्यानंतर बांगला देशच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात घुसखोरांचा जमाव जमू लागला आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांसाठी अटकाव केंद्रे स्थापन करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या 48 तासांमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात एक अटकाव केंद्र उघडण्यात आले आहे. आणखी एक अटकाव केंद्र (डिटेन्शन केंद्र) लवकरच स्थापन होत आहे.
संख्या नेमकी किती
भारतात बांगला देशातून घुसखोरी होण्याची प्रक्रिया अनेक दशकांपासून होत आहे. आतापर्यंत किमान अडीच ते तीन कोटी घुसखोर भारतात आले असावेत, असे अनुमान आहे. मात्र, त्यांची नेमकी संख्या सांगता येण्यासारखी स्थिती नाही. तथापि, प्रत्येक अवैध बांगला देशी नागरीकाला शोधून त्याची पाठवणी करण्याची व्यापक योजना केंद्र सरकारने सज्ज केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
परतण्याच्या प्रमाणात वाढ
बांगला देशचे अवैध नागरीक पश्चिम बंगालमधून परत बांगला देशात जाण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीपासून होत आहे. या वर्षी प्रारंभी हे परतण्याचे प्रमाण कमी होते. तथापि, गेल्या दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. अवैध घुसखोर स्वत:हूनच आपल्या मूळ देशात जाण्यास सज्ज आहेत. त्यांच्या पाठवणीची व्यवस्था सीमा सुरक्षा दलाच्या वतीने केली जात आहे. जे नागरीक स्वत:हून जाणार नाहीत, त्यांची पाठवणी अटकाव केंद्रांमध्ये केली जात आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सीमेवर बांगला देशात परतण्यासाठी कित्येक हजार लोक जमलेले आहेत. सेनादले त्यांना परतण्यात सहाय्यत्ता करीत असल्याचे दिसते.
सीमेनजीक अवैधांचा जमाव
ड बांगला देशात परतण्यासाठी अवैध घुसखोरांचा मोठा जमाव सीमेवर जमा
ड जे घुसखोर स्वत:हून मायदेशी परतणार नाहीत, त्यांच्या संदर्भात कारवाई
ड नागरीकत्व निर्धारणासाठी बांगला देशकडून सत्यापन घेण्याकरिता नोटीस
ड भारतात अडीच कोटींहून अधिक अवैध बांगला देशी नागरीकांचे वास्तव्य

