वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अरुंद रस्त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी संबंधित अधिकऱ्यांनी रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी वाहनचालकातून होत आहे.
दोन वर्षांपूर्वी मारुतीनगर ते निलजीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यावेळी बसवण कुडची येथील एका शेतकऱ्याने रस्त्यासाठी जमीन देण्यास आक्षेप घेतल्याने तेथील काम सोडून रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र तेथील अरुंद रस्त्याचा नवीन वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने तेथे वारंवार अपघात घडत आहेत. खास करून रात्रीच्या वेळी अरुंद रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने अपघातग्रस्त होऊन शिवारामध्ये जाऊन पडत आहेत.
बेळगाव कडून सांबऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना या अरुंद रस्त्याचा मोठा अडथळा होत आहे. नवीन वाहनचालक रस्ता रुंद आहे असे समजून वाहने जोरात चालवतात व कुडची गाव येताच अचानक अरुंद रस्ता नजरेस पडतो यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविण्यास वाहन चालकांना जड जात आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. याच रस्त्यावरून विमानतळाला जाण्यासाठी लोकप्रतिनिधी व उच्च अधिकाऱ्यांचे येणे-जाणे असते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून तेथील रस्ता रुंद करावा व वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

