वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी आणि गडगडाटादरम्यान गुरुवारी रात्री वीज कोसळल्याच्या दुर्घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. येथे पुढील दोन दिवस वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पाटणा, खगडिया, रोहतास, औरंगाबाद, कैमूर आणि छपरा यासह 20 जिह्यांमध्ये शुक्रवारी सकाळी अंधारून आल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये पुढील 3 दिवस हवामान असेच राहणार आहे. उत्तर प्रदेशातही पाऊस आणि वादळ सुरू आहे. लखनौ, प्रयागराज, झाशी आणि चंदौली येथे शुक्रवारी सकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.
या आपत्तीदरम्यान लखनौमध्ये रेल्वे स्टेशनचे पत्र्याचे शेड कोसळले. यात 2 जण जखमी झाले. राजस्थानच्या 12 जिह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर, मोरेना, श्योपूर, निवारी, टिकमगड आणि छतरपूर जिह्यांमध्ये दिवसा उष्णतेची लाट येईल, तर संध्याकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे.

