मे महिन्याच्या गर्दीत प्रवाशांचे प्रचंड हाल
न्हावेली/वार्ताहर
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाले असून हजारो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.मे महिन्यांच्या सुट्यांमुळे गाड्यांना आधीच प्रचंड गर्दी असताना आता तीन ते पाच तासांच्या विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपास भुयारी मार्ग बांधकामासाठी ३० एप्रिल आणि १ मे रोजी विशेष ट्रॉफीक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.या तांत्रिक कामामुळे विस्कळीत झालेली संपूर्ण मार्गावरील वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही.
कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रमुख गाड्यांच्या वेळा रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आल्या आहेत.यामध्ये मांडवी एक्सप्रेस २ मे रोजी सीएसएमटीवरुन सुमारे तीन तास उशिराने सुटली.जनशताब्दी एक्सप्रेस मडगाववरुन तब्बल पाच तास २४ मिनिटे उशिराने मुंबईला पोहोचली.कोकणकन्या एक्सप्रेस दोन तास ४८ मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली.एलटीटी मडगाव एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी सुमारे पाच तास उशिराने धावत आहे.दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ तास ४८ मिनिटे उशिराने सावंतवाडीला पोहोचली.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले तरी वाहतूक नेमकी कधी सुरळीत होईल. याबाबत अद्याप स्पष्टता नाही. केवळ जनरल नव्हे तर स्लीपर आणि चक्क एसी डब्यांमध्येही पाया ठेवायला जागा नव्हती.ज्या प्रवाशांनी महिनाभर आधी आरक्षण केले होते त्यानांही आपल्या हक्काच्या जागेवर बसणे मुश्किल झाले.यावर उपाय म्हणून सलग सुट्टया येतात.तेव्हा येतात.तेव्हा मुंबई सावंतवाडी आणि मुंबई चिपळूण अशा दोन विशेष अनारक्षित गाड्या सोडणे आवश्यक आहे.वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता सावंतवाडीपर्यत एक स्वतंत्र जलद रेल्वे सेवा कायमस्वरुपी सुरु करावी,अशी मागणी आहे.
प्रवाशांचे हाल !
कोकण रेल्वेच्या आरक्षित डब्यात पाय ठेवायलाही जागा नाही.मे महिन्याची सुट्टी आणि सलग सुट्टयांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा महापूर लोटला आहे.शनिवारी अवघ्या तीन तासांच्या अंतरात सुटलेल्या सात गाड्यांमध्ये झालेली अभूतपूर्व गर्दी पाहता आरक्षित डब्यात शिरणे कठीण झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

