आता राज्यातील सर्व स्मशानभूमी सर्वांसाठी खुल्या होणार
सोलापूर - राज्यातील स्मशानभूमींची सद्यस्थिती, त्यांचे अद्ययावतीकरण व परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा व परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.अभ्यास समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्या आधारे निष्कर्ष काढून अहवाल सादर केला जाणार आहे.
यावेळी राज्यात जिथेही विकासकामांची मागणी केली जाईल, त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिले. तसेच प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्षलागवड, छत, आरसीसी बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, अप्रोच रोड/पोहच रस्ता तसेच महिला, पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस मंत्री जयकुमार भाऊ गोरे,प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, आमदार देवेंद्र कोठे, अशोक राणे, . ऋषिकेश सकनूर, ॲड. गुरदीप सिंह अहलुवालिया, श्रीमती अश्विनी चव्हाण, जयवंत तांबे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

