7 किंवा 8 एप्रिलला निकाल लागण्याची शक्यता
बेळगाव : पीयुसी द्वितीय वर्षाचा निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील हुरहुर वाढली आहे. बारावीच्या गुणांवरच उच्च शिक्षण अवलंबून असल्याने आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे.
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 7 किंवा 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात 28 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान बारावीची पहिली परीक्षा झाली. परीक्षेनंतर अवघ्या आठवडाभरात उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हे गुण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा मंडळाच्या वेबसाईडवर घालण्यात आले. मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात होती.
राज्यात 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुका निमित्ताने निकालाच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. निकालाबाबतची स्पष्ट माहिती सोमवारी उपलब्ध होणार आहे. निकाल लागण्यास विलंब झाला तर परीक्षा 2 व 3 घेणे वेळ लागणार आहे. याचा परिणाम प्रवेशावर होण्याची शक्यता असल्याने निकाल लवकर देण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे. 7 अथवा 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

