विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारांचा आजही जगावर पगडा आहे. अनेकदा जगभरातून पर्यटक सांची येथील स्तूपाला भेट देत असतात. सांची सध्या जागतिक स्तरावर चर्चेत आलं आहे.
त्याचं कारण म्हणजे येथे असलेल्या गौतम बुद्धांच्या शिष्यांचे अवशेष. हे अवशेष सध्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ते अवशेष आता मंगोलिया देशात पाठवले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष पुढाकाराने, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या सांची स्तूपातील पवित्र अवशेष मंगोलियाला पाठवले जात आहेत. हे अवशेष भगवान बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे आहेत.
आज भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून शासकीय सन्मानाने ते दिल्लीत आणले जातील. उद्या ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवले जातील. यानंतर, भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान ३० मे रोजी या अवशेषांना मंगोलियाला घेऊन जाईल.
३१ मे पासून तुम्ही उलानबातारला भेट देऊ शकाल.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार ३१ मे पासून, हे अवशेष मंगोलियाची राजधानी उलानबातार येथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवले जातील. या ठिकाणी दहा लाखांहून अधिक यात्रेकरू आणि पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे भारत आणि मंगोलिया यांच्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील. तसेच, यामुळे सांचीसारख्या बौद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये परदेशी पर्यटकांची रुची वाढेल.

