रस्त्याच्या कडेला चालताना दुचाकीची जोरदार धडक
बार्शी : बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांचा संताप उसळला. आज सकाळी झालेल्या आणखी एका अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्याावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.
यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
आज सकाळी अविदाबाई शिवराज चौधरी (वय ६५, रा. पिंपळवाडी) रस्त्याच्या कडेला चालत असताना दुचाकीने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही.
तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ महिन्यांत या ठिकाणी अपघात झाले आहेत. आठ महिन्यांपूर्वी एक व्यक्ती दुचाकी व चारचाकी वाहनाच्या धडकेत ५०० मीटरपर्यंत फरफटत गेली होती.
पाच महिन्यांपूर्वी सुवर्णा गौतम चौधरी (वय ६५) यांचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वी रामदास योगीराज चौधरी (वय ५२) यांना दुचाकीची धडक बसून जखमी झाले. सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तातडीने गतिरोधक, सूचना फलक, स्पीड कंट्रोल उपाययोजना आणि सुरक्षितता व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वीच गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग असल्याने जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची परवानगी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रस्ताव सोलापूर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

