सरन्यायाधीशांसमोर उद्या होणार सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या हाय-प्रोफाईल प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून 25 मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
न्यायालयाने हे प्रकरण 'वैवाहिक घरात झालेला अनैसर्गिक मृत्यू आणि तपासातील कथित पक्षपात' यांचा समावेश असलेले एक गंभीर प्रकरण मानत निष्पक्ष तपासासाठी पावले उचलली आहेत.
या प्रकरणातील तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तपासात प्रक्रियात्मक त्रुटी होत्या आणि काही स्तरावरील न्यायालयीन हस्तक्षेपामुळे निष्पक्षतेशी तडजोड होऊ शकते, असे आरोप होते. असे आरोप केवळ तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, तर न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेवरही परिणाम करतात, असे मतप्रदर्शन करत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली.
तपासावर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा मुद्दा तपासाची निष्पक्षता हा आहे. या प्रकरणात प्रक्रियेत त्रुटी राहिल्या असून, काही स्तरावर न्यायालयीन हस्तक्षेपामुळे तपासावर परिणाम झाला असावा, असे आरोप केले जात आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण संस्थात्मक पक्षपात आणि प्रक्रियेतील विसंगतीचे प्रकरण मानून गांभीर्याने घेतले आहे.

