एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.
रविवारी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दोन टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. याबाबतचा निर्णय 3 जूननंतर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या पुढील दोन दिवसांत निश्चित केली जाईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल. एक पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. एखाद्यावेळेस उपमुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव आले तर, किती जणांना उपमुख्यमंत्री करावे हे अद्याप ठरलेले नाही. परंतु पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा सुरू आहे. 3 जूननंतर यावर स्पष्ट चित्र समोर येईल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बदलावर बोलताना, नवीन मुख्यमंत्र्यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया स्वाभाविकपणे पार पडेल. सत्तावाटपाचा भाग म्हणून केपीसीसीसाठी नवीन अध्यक्षांचीही नियुक्ती केली जाईल. सरकारच्या सुरळीत कारभारासाठी मुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष यांच्यात चांगला समन्वय असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी सहमत असणाऱ्या आणि जिथे पक्षाची संघटना मजबूत आहे अशा तळागाळात व्यापक पाठिंबा असलेल्या नेत्याला पुढील केपीसीसी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले.

