मुंबई : (Eknath Shinde) गेल्या तीन ते चार दिवसांपासून चर्चेत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी, आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली.
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या वाट्याला ९ पैकी २ जागा आल्या असून त्या जागेवर नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतला असून पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल."(Eknath Shinde)

