Dailyhunt
भारत होर्मुझ संघर्षात मोठी भूमिका बजावण्याची अपेक्षा!

भारत होर्मुझ संघर्षात मोठी भूमिका बजावण्याची अपेक्षा!

नवी दिल्ली,

Iran praises India अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत किंवा युद्ध थांबवण्याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही.

युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की माध्यमिक प्रयत्न करत आहेत, परंतु कोणताही अंतिम मसुदा तयार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इराणने भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्याला या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावता येईल असे म्हटले आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सांगितले की, भारताची मध्यस्थी खूप प्रभावी ठरू शकते आणि युद्धाच्या तणाव कमी करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

अलिकडेच, इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनीही भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले असून, भारत या संघर्षाच्या दरम्यान सकारात्मक आणि प्रभावी भूमिका निभावू शकतो, असे त्यांनी नमूद केले. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रविवारी रात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे औद्योगिक केंद्रे, रुग्णालये, शाळा, निवासी भाग तसेच अणुऊर्जा केंद्रांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांनी इशारा दिला की, इराणची जनता आणि सैन्य देशाचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे आणि हल्ल्यांचा परिणाम संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेवर होऊ शकतो.

सध्या इराणने पर्शियन आणि ओमानच्या आखातांना जोडणारा अरुंद सागरी मार्ग, होर्मुझ सामुद्रधुनी बंद केला आहे. जरी काही मित्र राष्ट्रांची जहाजे यामार्गातून जात असली तरी इराणने स्पष्ट केले आहे की अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना येथून जाण्याची परवानगी देणार नाही. या निर्णयामुळे जागतिक तेल आणि वायूच्या किमती वाढल्या आहेत. पश्चिम आशिया भारताच्या ऊर्जा पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असल्याने, भारताने अलिकडच्या आठवड्यांत राजनैतिक प्रयत्न करत होर्मुझमधील अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारताचा असा विश्वास आहे की, जर या सागरी मार्गावरील नाकेबंदी कायम राहिली, तर त्याचा भारतासह अनेक देशांच्या इंधन आणि खत सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur