Dailyhunt
धर्मपाल... ख-या भारताचा शोध घेणारा कोलंबस...!

धर्मपाल... ख-या भारताचा शोध घेणारा कोलंबस...!

ऊन सावली

गिरीश प्रभुणे

हमे वीर केशव

मिले आप जबसे

नई साधना की

डगर मिल गयी है...

डगर मिल गयी... डॉक्टरांनी निर्माण केलेली अतिसुक्ष्म लहरींची भारतीय राष्ट्रवादाची दुर्बिण...! यातून पाहू लागलं की, सारा भारत एका वेगळ्या चैतन्याने भारलेला दिसू लागतो. ख-या भारताचा शोध आपल्याला लागतो. कोलंबस युरोपातून भारत शोधयात्रेला निघाला. केवढी तयारी. मोठं कर्ज उभारणी सा-या युरोपातून उत्सुकता; समुद्रमार्गे यापूर्वी कोणीच गेला नव्हता. भारताकडे सारा व्यापार भूमार्गेच रेशिम मार्गावरूनच चाले. पण तो मार्ग आता अफगाणी मुसलमानांनी पूर्ण कब्जा केलेला. कोलंबसची भारत शोधयात्रा ही युरोपला नवचैतन्य देणारी ठरली. अनेक छोट्या-मोठ्या देशांनी अशा शोधयात्रा राबविल्या. संकटे झेलीत शिडाच्या जहाजातून जीव धोक्यात घालून या शोधयात्रा का राबविल्या...? अफगाणांच्या आधी सिकंदर, शक, हूण, कुषाण अशांनी असंख्य वेळा आक्रमण केलं. प्रचंड लूट नेली. मोगलांंनी तर सारी नाकेबंदी करून चार-पाचशे वर्षे दिल्लीवर राज्यच केलं. हे सर्व भारताकडे का येत होते? याच इंग्रजांनी जो इतिहास लिहिला, तो आम्ही कसे दरिद्री, भिकारी, अडाणी, अंधश्रद्धा जोपासणारे. विषमतेचा अर्क आम्हाला संस्कृती नाही. आमच्यात एका राष्ट्रीयत्वाची भावना नाही. आमच्या भाषा मागासलेल्या. आमच्याकडे विज्ञानाचा अंश नाही. शिक्षणाचा गंध नाही. असं सर्व बाजूंनी मागासलेले खुरटे लोक भारतीय. पहिल्या गोलमेज परिषदेत गव्हर्नरने अशी दर्पोक्ती उच्चारली. महात्मा गांधींनी त्यांना अडवत म्हटले, ''इंग्रज आल्यानंतर भारत अडाणी होत गेला. इंग्रज येण्यापूर्वी भारत सर्वच अंंगाने समृद्ध होता.''

खरं तर भारताच्या असंस्कृत मागासलेपणाचं वर्णन हे युरोपियनांना लागू पडतं. बाराव्या शतकापर्यंत युरोप अत्यंत मागासलेला होता तर भारतात तक्षशिला-नालंदासारखी शंभरेक विश्वविद्यालये होती. परंतु याचे पुरावे मिळत नव्हते. मोहोंजोदारो-हडप्पा- अजंठा-वेरूळ याच्या दर्शनाने स्तिमित झालेल्या पाश्चात्त्य विचारवंतांनी त्याचाही उपयोग इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठीच केला. धर्मपालजी म. गांधींचे अनुयाई. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उतरले. अनेक प्रकारच्या ग्रामविकासाच्या प्रत्यक्ष प्रयोगात मीरा बेनबराबर त्यांनीही काही वर्षे कामही केले. इस्रायलचे प्रयोग प्रत्यक्ष जाऊन अनुभवले. यानंतर मात्र दहा-बारा वर्षे इंग्लंडमध्ये राहून त्यांनी भारताचा शोध घेतला. लाखो कागदपत्रं हाताळून वाचून नकळून आणून १७-१८ आणि १९व्या शतकातील भारत कसा होता, हे त्यांनी सप्रमाण जगाला दाखवून दिले. हे त्याचं संशोधन, त्याकरिता घेतलेले श्रम हे अचंबित करणारे आहेत.

इंग्रजांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी ते संगतवार संग्रहित केलेत. आजवर त्यावर कुणीच प्रकाश टाकला नव्हता. उलट इंग्रजांनीच लिहिलेल्या खोट्या भ्रष्ट इतिहासाची नक्कल येथील विद्वान करीत आले. धर्मपालजींचं हे कार्य मोहोंजोदारो-हडप्पाच्या उत्खननापेक्षाही एक जिवंत जागता चालता-बोलता इतिहासच अगदी काल-परवाच्या वर्तमानाचा तो सुद्धा इंग्रजांचाच अधिका-यांनी १७ व्या-१८ व्या शतकात प्रत्यक्ष पाहून पाठविलेल्या खलित्यांमधून दिसणारा. भारतातील शिक्षण या खंडानं तर सारे भ्रम दूर व्हावेत. १२व्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केलेल्या तक्षशिला-नालंदासारख्या जगातल्या एकमेवाद्वितीय अशा सर्वंकष शिक्षण व्यवस्थेनंतर ५०० वर्षांनीसुद्धा संपूर्णत: भारतभर चालणारी हजारो गुरुकुल, पाठशाळा, त्यातील आचार्यगण, लाखो विद्यार्थी, स्त्री-पुरुषांची त्यातील उपस्थिती, विषयांची वर्गवारी; एवढेच नव्हे तर तर जातवार आचार्यांची संख्या, विद्याथ्र्यांची संख्या, मुलींची संख्या ही चक्रावून टाकणारी आणि अभिमानाने ऊर भरून यावी अशी! संपूर्ण भारत हा ज्ञानसंपन्न उद्योगप्रधान, ग्रामव्यवस्था आत्मनिर्भर तसेच व्यापारात अग्रगण्य कसा होता, हे धर्मपालजींनी दाखवून दिलं.

विशाखापट्टणम् या जिल्ह्यातील इंग्रज अधिका-याने पाठविलेल्या अहवालाचा नमुना पाहण्यासारखा आहे. या जिल्ह्यात एकूण पाठशाळा ७५१, तर विद्यार्थी संख्या- दलित (शूद्र) ८३३ (पु), ४९ (स्त्री), ब्राह्मण क्षत्रिय वैश्य- ४८३५ (पु), ४९ (स्त्री), मुस्लिम छात्र ८० लोकसंख्या ४,५६,९६१. या प्रमाणे संपूर्ण भारताचे सर्वेक्षण १८२१ मधील आहे. सर्वेक्षणात खूप तपशील आहे. हिंदू पाठशाळा, मुस्लिम मदरसे, विषयांची सूची. वयोगट ५ ते १५, वेळ सकाळी ९ ते ११, सायंकाळी ६ ते ८ आणि ११ ते ९ अशी निवासी विद्यालये, गुरुकुल. यात दलित स्त्री-पुरुषांचाही सहभाग आहे. काही विशेष विभाग आहेत. चित्रकारी, शिल्पकारी, रेशीम, सुती मागावरचे विणकाम अशा चाळीसेक प्रकारांच्या कौशल्यांची यादी दिली. याच बरोबर फारसी, उर्दूचेही स्वतंत्र विषय आहेत. नृत्य शाळांची संख्या आणि त्यात शिक्षण घेणा-यांची संख्या ही खूप मोठी आहे. अर्थशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान हे विषयही स्वतंत्रपणे शिकविले जायचे. पाटी-पेन्सिल हा भारतातला एक मोठा उद्योग होता. कागदाची वही, चोपड्या, शाई-बोरू, लेखण्या हा पण सार्वत्रिक उद्योग होता. धर्मपालजींच्या संशोधनाने भारतीय विचारविश्व ढवळून निघायला हवे होते. पण ते तसे फारसं घडलं नाही. याचे कारण सत्तेत असणारे काँग्रेसचे सरकार. त्यांची सेक्युलर म्हणजे मुस्लिम-ख्रिश्चन धार्जिणी वृत्ती. हिंदुहिताकडे पूर्ण दुर्लक्ष. यामुळे धर्मपालांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा परिचय समाजाला होऊ शकला नाही. ज्यावेळी झाला, त्यावेळी काही मोजक्याच विचारवंतांनी त्यांची दखल घेतली. सुश्री इंदुमतीताई काटदरे यांनी प्रयत्न करून प्रथम गुजरातीत आणि हिंदीत त्यांचे सर्व खंड आणले. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे वेळ लागला. भारतीय शिक्षण मंडळाने हे सर्व खंड मराठीत आणले. आता सर्व भाषांत होतील. या ग्रंथांचे संदर्भ घेऊन त्या आधारे पाठ्यक्रम- भारतीय विद्याचं मनोहर दर्शन करणारी दूरदर्शन मालिका-महानाट्य, महाभारतसारखे करून लोकांमधील विशेषत: सुशिक्षितांमधील न्यूनगंड दूर करावा लागेल.

धर्मपालजींच्या या इंग्रजी लेखनावर मराठीत एक स्वतंत्र टीका लेखन करणारे 'अपूर्णक्रांती' हे पुस्तक प्रसिद्ध माक्र्सवादी टीकाकार 'मीमांसाकार' कै. रा. भा. पाटणकर यांनी लिहिलेलं (मौज प्रकाशन) प्रसिद्ध आहे. याच्या नावातच 'अपूर्णक्रांती' स्वातंत्र्य लवकर आल्यामुळे इंग्रज लवकर गेले. अन्यथा त्याची भारताला बदलवण्याची क्रांती पूर्ण झाली असती. भारताची गणना पाश्चात्त्य देशांप्रमाणे एक आधुनिक राष्ट्र अशी झाली असती. पण क्रांतिकारक आणि महात्मा गांधी आदी सर्व नेते यांनी घोटाळा केला आणि भारतातील क्रांती अपूर्णच राहिली, अशी खंत यात पदोपदी जाणवते. परंतु धर्मपालजींची मते खोडून काढण्यात रा. भा. पां. ना अपयश आले तरीही भारताची प्राचीन समृद्धी आदी १९व्या शतकापर्यंत कशी तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण कौशल्याद्वारे पोहोचली होती, हे लक्षात येऊन ऊर भारतीय समाजाच्या या विविधतेने नटलेल्या ज्ञान-विज्ञानानं भरून येतो. कुसुमाग्रजांना कालंबसाच्या त्या भारत शोधयात्रेतील अथांग खवळलेल्या सागरानं मोहीत केलं. त्यांनी कोलंबसाचे गौरवगीत लिहिलं.

अनंत अमुची ध्येयासक्ती

अनंत अमुच्या आशा

किनारा तुला पामराला...

या काव्यात जसा कोलंबसाचा गौरव आहे तसा तो भारताचा आहे. भारतशोधाचा आहे. याच भारतशोधाची खरी दुसरी बाजू धर्मपालजींनीनी अधोरेखित केलीय आणि ही भारतीय विद्या केवळ उच्चवर्णियांची (तथाकथित) मक्तेदारी नसून भारताच्या कानाकोप-यात कडेकपारीत-वन अरण्यात-गिरीकंदरात-गावा-पाड्यात, वस्त्या-वस्त्यांतून घनघोर अंधकार युगात-मुस्लिम धर्मांध आक्रमक आणि शिस्तबद्धतेचा, न्यायदेवतेचा साजशृंगार करून बेधडक लाखोंना अन्यायानं फासावर लटकावणारे ख्रिश्चन, इंग्रजांना पुरून उरलेला सर्व ज्ञानसंपन्न समाज धर्मपालजींनी आपल्या अतुलनीय संशोधनानं सिद्ध केलाय. पद्मश्री वि. श्री. वाकणकरांच्या ४५ हजार वर्षांपूर्वीच्या संशोधित शैलचित्रांपासून भूमिती-गणित रंग लेखणीचा उपयोग करून समृद्ध बनला. भारत धर्मपालांनी इंग्रजांनीच जमवलेल्या दाखल्यांच्या आधारे सिद्ध केला. दिनांक २५ ऑक्टोबर त्यांचा स्मृतिदिन. २०२३ हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दीचे वर्ष. धर्मपालजींच्या स्मृतींना ही अल्पशी श्रद्धांजली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur