Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गंभीरचा फॉर्म्युला; कसोटी मालिका ३ सामन्यांचीच हवी!

गंभीरचा फॉर्म्युला; कसोटी मालिका ३ सामन्यांचीच हवी!

नवी दिल्ली,

Gambhirs formula भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कसोटी मालिकांच्या आयोजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेपेक्षा तीन सामन्यांची कसोटी मालिका अधिक योग्य असल्याचे त्यांचे मत आहे.

एखाद्या संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला तरी त्याला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी पुरेशी संधी मिळावी, यासाठी तीन सामन्यांची मालिका महत्त्वाची असल्याचे गंभीर यांनी सांगितले. भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना गंभीर यांनी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आपली पसंती असल्याचे सांगितले.

दोन सामन्यांच्या मालिकेत एखाद्या संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाल्यास त्याच्यासमोर पुढील सामना जिंकण्याचेच लक्ष्य उरते. मात्र, दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत सुटू शकते. याउलट तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतरही संघाला पुनरागमन करून मालिका जिंकण्याची संधी असते. यासाठी गंभीर यांनी २००१ मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचे उदाहरण दिले. भारताने सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत ती मालिका २-१ अशी जिंकली होती. कसोटी सामन्यांमधील अंतर कमी असले तरी खेळाडूंच्या फिटनेसबाबत संघ व्यवस्थापन योग्य काळजी घेत असल्याचे गंभीर यांनी सांगितले. खेळाडूंना आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याची जाणीव असते. गरजेनुसार सराव सत्रांमध्ये खेळाडूंना विश्रांती किंवा बदलाची संधी दिली जाते. विशेषतः वरिष्ठ खेळाडूंना सलग सामने खेळणे आव्हानात्मक ठरू शकते, त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण व्यवस्थापनाकडून लक्षात घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत युवा खेळाडूंच्या कामगिरीने गंभीर प्रभावित झाले आहेत. देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात १६७ धावांची निर्णायक खेळी केली. तर मानव सुथारने आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्याच कसोटी सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत सामन्यात १० बळी मिळवले. युवा खेळाडूंना संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा योग्य फायदा घेतल्याचे पाहणे समाधानकारक असल्याचे गंभीर यांनी म्हटले. मात्र, एका-दोन सामन्यांतील कामगिरीवरून युवा खेळाडूंचे मूल्यमापन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ सातत्यपूर्ण कामगिरी करत कसोटी क्रिकेटच्या कठीण आव्हानांमध्ये स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. संघातील वाढती स्पर्धा ही सकारात्मक बाब असून अधिक खेळाडू आपले स्थान निर्माण करू लागल्यास संघाची ताकद वाढते, असे गंभीर यांनी सांगितले. पडिक्कल आणि मानव सुथार यांच्यासह साई सुदर्शनसारख्या प्रतिभावान खेळाडूंचाही त्यांनी उल्लेख केला.यशस्वी जयस्वालच्या कट शॉटवरून वारंवार बाद होण्याबाबतही गंभीर यांनी आपली भूमिका मांडली. एखाद्या फलंदाजाला त्याचा आवडता फटका खेळण्यापासून रोखणे योग्य नसून तो फटका अधिक प्रभावीपणे कसा खेळता येईल, यावर काम करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. फलंदाजाला धावा करण्यासाठी त्याच्या नैसर्गिक फटक्यांचा वापर करू देणे आणि त्यात सुधारणा करणे हे संघ व्यवस्थापनाचे काम असल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील भारताच्या स्थानाबाबत गंभीर फारसे चिंतित नाहीत. भारत सध्या पाचव्या स्थानावर असला तरी संघाच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सध्याच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकणे हेच सध्याचे लक्ष्य असून, पुढील परिणाम आपोआप स्पष्ट होतील, अशी भूमिका गंभीर यांनी मांडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur