मुंबई
Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी मोठे पाऊल उचलत नवीन नेमणुका जाहीर केल्या आहेत. 'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष' अशी मनसेची ओळख अधिक दृढ व्हावी, यासाठी ठाकरे यांनी संपर्क अध्यक्षांची नवीन यादी जाहीर केली आणि कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले.
ही घोषणा त्यांनी शिवतीर्थ येथील आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली.
ठाकरे यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात मनसेची ताकद वाढवणे आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पक्षाने 'संपर्क अध्यक्ष' ही संकल्पना राबविली असून विविध विभागांवर नेते, सरचिटणीस आणि विभागाध्यक्षांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. संबंधित अधिकारी महिन्यात किमान तीन दिवस आपल्या जिल्ह्यांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतील आणि नागरिकांशी थेट संवाद साधतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मनसे आता आगामी Raj Thackeray निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली लक्षात घेऊन संघटनेत बदल करत आहे. ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी तीन वर्षांच्या रोडमॅपवर चर्चा करताना प्रत्येक जिल्ह्यात मनसेची उपस्थिती दृढ करण्याचे निर्देश दिले आहेत.ठाकरे यांनी जाहीर केलेल्या नवीन संपर्क अध्यक्षांच्या यादीत कोकण विभाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

