- प्रशांत किशोर यांनी दाखवला आरसा
गोवा,
मोदी सत्तेबाहेर जातील या गैरसमजातून राहुल गांधींनी बाहेर यावे. पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपाचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक आहे, असा आरसा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज गुरुवारी राहुल गांधी यांना दाखवला आहे.
प्रशांत किशोर यांनी गोव्याच्या दौर्यावर असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, काँग्रेसला पुढील अनेक दशके भाजपाशी लढावे लागणार आहे. प्रशांत किशोर सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करीत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलची व्यूहरचना आखण्यासाठी ते गोव्यात पोहोचले आहेत. अनेक दशके भाजपाच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, केवळ मोदी लाटेपर्यंतच भाजपा सत्तेत राहणार आहे, या भ्रमात राहुल गांधी आहेत.
गोव्यात म्युझियममधील एका कार्यक्रमादरम्यान प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा जिंकेल किंवा हरेल, पण काँग्रेसच्या 40 वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. भाजपा कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात 30 टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजपा कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपाचा सामना करावा लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले.
ताकद जाणून घेतल्यास मोदींचा सामना शक्य राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत. ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की, लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहीत असेल, तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

