प्रासंगिक
चंद्रशेखर नेने
कुठल्याही हुकूमशहाला देशापुढचे प्रश्न वाढताना दिसले की, तो हटकून देशाच्या सीमेवर तणाव निर्माण करतो.
याशिवाय आणखीही काही मोठी आव्हाने सध्या चीनपुढे आहेत. यावर्षी चीनमध्ये प्रचंड पाऊस झाला. मोठ्या भूभागावर पूर येऊन पुराचे पाणी पसरले. मुख्यत: उत्तर पश्चिम चीनमध्ये, जिथे त्यांच्या कोळसा खाणी आहेत, तिथे विशेष मोठे पूर आले. त्यामुळे या खाणीतून पाणी भरले आहे. म्हणून पुरेसा कोळसा खणून काढता आलेला नाही. चीनमध्ये ५० टक्के वीजनिर्मिती कोळसा वापरूनच केली जाते. स्वत:च्या खाणीतील कोळसा पुरत नाही, त्यामुळे चीन दरवर्षी ऑस्ट्रेलियातून कोळसा आयात करतो. पण, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध सध्या अतिशय खराब झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाने, कोरोना विषाणू वुहानमधूनच उगम पावला आणि त्यामुळे त्याची जबाबदारी चीनची आहे, असे विधान केल्यापासून या दोन्ही देशात वितुष्ट आले आहे. त्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियाला क्वाड आणि ऑकसचे सदस्य बनवून चीनशी थेट शत्रुत्व केल्याने चीन संतापला आहे. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाचा कोळसा घेणे बंद केले आहे. असा सुमारे २० लाख टन कोळसा चीनच्या बंदरांत पडून होता; तो काही भारतीय व्यापा-यांनी विकत घेऊन भारतात आणला आहे. त्यातसुद्धा त्यांनी २० टक्के सवलत मिळविली आहे. भारताची अर्थव्यवस्था आता जोमाने उसळी घेत आहे. त्यामुळे आपल्यालासुद्धा अधिकची वीज निर्माण करायचीच आहे. त्यासाठी हा कोळसा उपयोगी ठरेल. पण असा कोळसा गमावल्यामुळे सध्या चीनमध्ये अभूतपूर्व विजेची टंचाई निर्माण झाली आहे. कारोनाच्या फटक्याने चिनी अर्थव्यवस्था धीम्या गतीने चालली होती. आता कोरोना उताराला लागल्यामुळे त्यांच्या उत्पादनक्षम कारखान्यांची वाढ अपेक्षित आहे. नेमक्या याच वेळेस विजेची मागणी तर वाढलीय्, पण पुरवठा कमी झाला आहे. परिणामी सध्या अध्र्याहूनही अधिक चीनमध्ये अंधाराचे राज्य आहे. उत्तर चीनमध्ये आता थंडीचा जोर वाढला आहे. तरीही त्यांना सध्या वीज वापरून पाणी गरम करण्यास सरकारने मनाई केली आहे. विजेच्या कमतरतेमुळे ब-याच कारखान्यात काम बंद पडले आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक कामगारांवर नोकरी सुटण्याची पाळी आली आसे. या सर्व गोष्टींमुळे समाजात असंतोष वाढत चालला आहे.

