मुंबई,
महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या २-३ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्य़ात येत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागांमध्ये पुरसदृश्यं स्थिती निर्माण झाली आहे.
अशातच आता पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ओडिशा, आंध्र प्रदेश, कोलकाताच नाही तर महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा (cyclonic storm) तडाखा बसण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य बंगालच्या खाडीतून हे चक्रीवादळ पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील गड़चिरोलीसह आजूबाजूच्या भागांत या चक्रीवादळामुळे वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोलकाता, पूर्व मिदनापूर, पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आता कुठे पाऊस उसंत घेतो म्हणता, पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका असल्याने, हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
पुढील 6 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (deep depression) चक्रिवादळ होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

