नाशिक : अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढून भाजपमध्ये येऊन कर्तृत्व गाजविणाऱ्या नेत्याला राहुल गांधींनी आज सर्वांत "भ्रष्ट" मुख्यमंत्री असल्याचे "सर्टिफिकेट" देऊन टाकले!!
जोपर्यंत हा नेता काँग्रेसमध्ये होता आणि राहुल गांधींचे ऐकत होता, तोपर्यंत हा नेता "भ्रष्ट" नव्हता, पण तो काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि कर्तृत्व गाजवायला लागला, त्याबरोबर तो नेता देशातला सर्वांत "भ्रष्ट" मुख्यमंत्री ठरला!! Rahul Gandhi
राहुल गांधींनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांना देशातला सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले. हेमंत विश्व शर्मा यांचा कंट्रोल नरेंद्र मोदींच्या हातात आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की उडी मार तर हेमंत विश्व शर्मा उड्या मारतील नरेंद्र मोदी म्हणाले की अमित शाहांच्या पाया पड तर हेमंत विश्व शर्मा अमित शाहांच्या पाया पडेल, असा टोमणा राहुल गांधींनी मारला.
- राहुल गांधींची कुत्र्याला बिस्किटे
हे तेच हेमंत विश्वशर्मा आहेत, ज्यांनी आपली अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढली, काँग्रेस मधून त्यांनी चार वेळा आसाम मध्ये आमदारकी आणि मंत्रिपदे भूषविली, पण ते ज्यावेळी राहुल गांधींना भेटायला त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी राहुल गांधींनी त्यांच्याकडून आसाम मधल्या काँग्रेसच्या तक्रारी ऐकून घेणे ऐवजी स्वतःच्या कुत्र्याला बिस्किट खायला घालणे पसंत केले होते. आसाम काँग्रेसमधल्या समस्या दूर करून काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणायची हेमंत विश्वशर्मांनी तयारी केली होती. ते आसाम मधल्या काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी राहुल गांधींच्या कानावर घालायला गेले होते. पण राहुल गांधींनी त्यांचे कुठलेच म्हणणे ऐकून घेतले नाही. हेमंत विश्वशर्मा बोलत राहिले त्याचवेळी राहुल गांधी त्यांच्या कुत्र्याला बिस्कीट खायला घालत राहिले. हेमंत विश्वशर्मा चिडले. राहुल गांधींनी आपली किंमत त्यांच्या घरातल्या कुत्र्यापेक्षा कमी केली याचा त्यांना राग आला. म्हणून त्यांनी काँग्रेस सोडून भाजप स्वीकारला. भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले.
त्यानंतर आज राहुल गांधींनी आसाम मधल्या प्रचार सभेत जाऊन हेमंत विश्वशर्मा यांना देशातला सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले.
- हेमंत विश्वशर्मांचे कर्तृत्व काँग्रेसला घातक
याच हेमंत विश्वशर्मा यांनी आसाम मध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. त्यांनी आसाम विधानसभेत लव्ह जिहाद विरुद्धचा कायदा मंजूर करून घेतला. आसाम मधली बहुपत्नीत्वाची प्रथा संपविण्याचा कायदा केला त्यामुळे ते आसाम मध्ये बंगाली आणि मियां मुस्लिमांमध्ये अप्रिय झाले. हेमंत विश्वशर्मांनी आसाम मधली काँग्रेस खणून काढली. काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई यांची पत्नी ब्रिटिश आहे पण ती पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ची एजंट असल्याचा आरोप हेमंत विश्वशर्मांनी केला. पण ते फक्त राजकीय आरोप करून थांबले नाहीत. त्यांनी गौरव गोगोई यांच्या ब्रिटिश पत्नी विरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत खटला दाखल केला.
- राजकीय वास्तव
या सगळ्या घडामोडींमुळे राहुल गांधी चिडले आणि त्यांनी आज आसाम मधल्या प्रचार सभेत हेमंत विश्वशर्मांना देशातला सर्वांत "भ्रष्ट" मुख्यमंत्री असल्याचे सर्टिफिकेट देऊन टाकले. हेमंत विश्वशर्मांचे आसाम मधले सरकार गेल्यानंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यांना सामोरे जावे लागेल. त्यांना काँग्रेस माफ करणार नाही, असा इशारा सुद्धा राहुल गांधी यांनी दिला. पण याच हेमंत विश्वशर्मांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची तब्बल 30 वर्षे काँग्रेसमध्ये काढल्याचे राजकीय वास्तव मात्र राहुल गांधी विसरून गेले.

